



पुरुषांच कर्तृत्व बायकांसाठी वर्ज होतं,
रांधा, वाढा, उष्टी काढा एवढंच अस्तित्व होतं|
भातुकलीच्या खेळात खरंखुरं बाशिंग बांधल जात होतं,
एका कळीला उमलण्याला नाकारतं होतं|
एका ज्योतिबाने पुण्यं बांधलं,
हातामध्ये भार्येच्या लेखणीचं बळ दिलं|
सावित्रीच्या धैर्याने उंबरठा ओलांडला,
शेण, दगड,शिव्याशाप सोसला|
तिच्या आभाळाला संकटांच क्षितिज राहिलं,
स्त्री स्वातंत्र्याला मर्जीच अनंत आकाश लाभलं|



दिवस डोंगरा एवढा,
आटता आटेना भक्तीचा ओढा,
उदास राऊळी तगमग जीवा,
बंदिस्त भक्ता पांडुरंग भेटवा॥
अचल दिंड्या पताका,
निश्चल नामघोष गर्जना ,
जळाविन मासोळी भक्तीचा ध्यास,
माऊलीची लेकरांना आस॥
सोनसकाळी उजळून विठूचे राऊळ,
लोपेल श्रद्धा- सबूरीचा काळ,
सोडूनी संसार जन- कृषक निघेल,
भेटीचे संचित विठू गहिरेल॥
सुख-दुःखाचा खेळ ना देवा चुकत,
संसाराचे चक्र सद्भावना वंचित,
वाट वाटाड्या वाटसरू चुकती
नव्यााने वेळ भेटीत तृष्टती॥


उष:काल की काळरात्र कळले कुणा,
जरी भूतकाळात त्याच्या खाणाखुणा ||
विज्ञान इथे तोकडे झाले,
गलितगात्र मानवास केले,
निसर्गाचे चक्र फिरले,
क्षणात सगळे पालटून गेले|
देवाने कवाडं बंद केले,
माणसांत देव शोधण्यास भाग पाडले,
श्रद्धेला गालबोट न लावले,
मानवा संगें बंदीवासात राहिले|
संकट काळी जरी मृत्यूने गाठले,
विश्वासाचे नाते हातात हात गुंफून राहिले,
हव्यासाला हतबल केले,
कोणी अन्नाविना नाही मेले|
अनंत प्रश्नांचे उत्तर न भेटले,
विज्ञाना पलिकडेचे ज्ञान लाभले,
धेय सक्त मानवास ठेवले,
नव्या पहाटेत भविष्य सामावले|


सारे काही संपले आहे,
त्यापलिकडे तूझे अस्तित्व आहे,
असंभव स्वप्न तूच दाखवतो आहेस,
खडतर मार्गावर वेळोवेळी हात पकडतो आहेस,
मी गुण-अवगुणांचा गुलाम आहे,
मी-मी मध्ये अडकतो आहे,
अभिमान,गर्व यामध्ये पुसटशी रेषा आहे,
कितीदा तूच जाणीव करून देत आहे,
मी विसराळू आहे,
अहं माझा मोठा आहे,
प्रत्येक वेळी तूझे कारण आहे,
संकटांबरोबर तूझे अस्तित्व आहे,
माझी दृष्टी कमजोर मनावर भयाचे अधिराज्य आहे,
तू अदृश्य अजूनही बोट माझे पकडतो आहे.

