सार

कोण तू ?काय पुसशी

तू ती कालचीच मी असशी

कमावती तू सारी सूखे उशीशी

शिकून शहाणी सुरती दिसशी।

एकलीच रातं कुण्या कामात जागली

नायं पोरबाळं, मायबाप सदनी

ऊठ, ऊठ बये पहाट जाहली

जागा शोधतो नारायण तुझ्या अंगणी।

मरं मरं एकलीच काय मरती

जरा सवडीन चल आपुल्या घरी

इसरली का? घर आपुले चाफेखणी

चौकात तुळस, परसबाग मागल्या दारी।

सदरेच्या सोप्यामदी नको डोकाऊ बाई

सासूबाईंचे सोवळे अंतर राहू दे देवघरी

नको जाऊ दिवाणखाणी पदर नाय डोई

माजघरी दाट अंधार घे जरा निभाऊनी

मुदपाकखाणा इतं आपुला लवाजमा

बाळंतीनीच्या खणातून टहऽऽया ऐकू आला

उघड फडताळ सूईनीला देऊ दानपसा

बाळ आनंदी आनंद घेऊनी आला।

बाशिंग बांधूनी आली तू द्वाड सासरी

लाजरी बुजरी आई-बा विना पोरकी

न्हातीधुती होऊनी झाली शहानी सुरती

ताबा तूझा तू धोस दाखवी घरावरी

सूगरण तू गोड गळ्याची भूपाळी

भावकीचा मान तू कशिद्यात हात ना कुणी धरी

दिवा जळला धडाडीने सांगे दिवाणखान्याची दिवळी

मी पण बांधून खुंटाळी राबली संग कारभारी।

तूच ती कालची यमामागून जाई

सावित्री

आजची तू मार्ग एकला देई सावित्री

तूच ती ज्ञानाची तुळस लावी घरीदारी

गुंजाळे सत्व कि सत्य अंतःकरणी खातरी।

कुंकू मंगळसूत्र कालचा बंध ना संसारी

लेणं-देणं संसाराच उतरंड सार सारी

चार भिंतीचा आधार सार भावबंध ना संसारी

सारं जग, सारं स्वातंत्र्य एकलं सार सारी।

अखेरचा निरोप

लाख मोलाचा बाप

लाख मोलाची त्याची साथ

जसा सूर्य तळपतो नभात

लेकरु घास घेते सुखात

बाप झुकतो लेकरासाठी

मन कातर कातर

तयाचा मान अभिमान

सांडतो फाटक्या झोळीत

कसा कळावा बाप लेकरास

घालतो साद जाता जाता

त्याची भेट भ्रम कि भास

मुराळी होऊनी आला अखेरिस

कानाशी आले प्राण

जीव व्याकुळ व्याकुळ

आरोप ना निरोप

हरवली नजरेतील ओढ

अखेरची हि ताटातूट

दाटतो आक्रोश आक्रोश

दिवस जसा एक जन्म

बाप गेला डोंगरा आड

हरवले आशिशाचे तेज

आता काळोख काळोख

कोणावर विसंबू जगात

चटका मायेचा भर संसारात।

तडफड मागून अर्थ कळता

उमगे ना मन जळता जळता

परतीचा हा नव्हे प्रवास

भेटी साठी जावे लागे त्याच प्रवासास।

निरोप

तू अन् मी पाशधारी

तू एकटाच अंकुशधारी

स्वागत अथर्व संपले नाही

पाठवणी कशी करू

निरोप मी कसा देऊ ।

तू अन् मी व्रतधारी

तू एकटाच पंचतत्वाधिकारी

मन भरुन गौरीसुत पाहिला नाही

हौसेचा पूर ओसरला नाही

चैतन्य कसे सारू

निरोप मी कसा देऊ।

तू अन् मी वाणीपती

तू एकटाच गुणपती

ऊॅं स्वरूप हुंकारला नाही

दंग वंदनात पाहिला नाही

मोदकाने अतृप्त दहीभात कसा देऊ

निरोप मी कसा देऊ।

नको देऊस मोठेपण

ते नसिबातले चंद्रताऱ्यांचे,अंकगणितातले दैवी आकड्यांचे भोळेपण

घडून गेल्यावर घडल्याचे,फसूण गेल्यावर फसल्याचे वेळेचे खालीपण

मुग्ध, चित्तचोर,चटोर मनाचे;चतुर, चाणाक्ष,चालाख क्षणांचे खोटेपण

मागे वळून पाहताना असे वाटते नको देऊस मोठेपण

हरवून सौंदर्य विषयातले विषयांतर, काळाचे अटळ रूक्षपण

धुंदीत जगणे,जगणे अवांतर षड़रिपुंचे एकाकी मीपण

अष्टांग तोडून जोडून कडी कडीने अगाध सृष्टीचे घेऊन मोठेपण

हरवून माणसातले माणूसपण असे वाटते नको देऊस मोठेपण

कवितेचा गाव

स्वप्नात कवितेचा गाव पाहिला

एक झोपडे बांधण्याचा वेडा चंग बांधला

बाभळीचा ओंडका आधार झोपडीला

सोनचाफ्याचा दांडका उंबरठा झोपडीला

पोसल्या जाणिवांचा कडबा कुडाला

कल्पवृक्षांच्या झावळ्यांनी छत झाकोळला

शेणामातीने अनुभूती कुड सारवला

चुनखडी गेरूने वारली रेखाटला

काय कुठे चुकले ना मर्म कळला

कवितेला रंग ना गंध भरला

मग भावनांच्या कुरणात फेरफटका मारला

आशय शोधण्याचा छंद जोपासला

अभिरुचीने पद्याशी पद्न्यास केला

चारोळी, गझल पवित्र भाव कळला

मुक्त छंद तो छंदात उधळला

थोडे शौर्य, थोडे क्रौर्य झोपडीचा आधार त्यागला

काट्याबरोबर गुलाब हुंगला

रातराणी मोगरा डोंगर दरी शोधला

नीर नदीचा नूर शोधण्या खळाळला

ऋतूचा रंग शिरी माळला

मग मातीने मोहक गंध भरला

चंद्रताऱ्यांनी कशिदा काढला

दु:खाच्या झालरीने श्रृंगार सजला

असा कवितेचा संसार थाटला

कल्पनेचे डोहाळे दिसामासी वाढला

वृत्त, छंद, अलंकार गुण बाल्यातला

सत्याहून सुंदर अर्थ स्वप्नातला

कवितेने कवितेचा ध्यास घेतला

स्वप्नात कवितेचा एक सुंदर गाव पाहिला

‘रतन’टाटा

देव माणूस गौरविला

दानशूर कोणी वर्णियला

माणसातून एक माणूस गेला

म्हणून सारा देश हळहळला।

कोणासाठी उर्जेचे स्त्रोत

कोणासाठी महानायक

नसून घरातला तो देव घरातला

म्हणून सारा देश हळहळला।

कोणी दूरूनच पाहिला

कोणी जवळ जाऊन जाणिला

नसे फक्त अन्नदाता टाटा परिवाराला

म्हणून सारा देश हळहळला।

दिमाखाचे ओझे समजला

जमिनीवर बसूनी साधेपणा साधला

अशक्य ते शक्य पाहून जन अचंबला

म्हणून सारा देश हळहळला।

मृदु सौम्य ते रत्न

पद्म विभूषित ‘रतन’

स्वयं सिद्ध ते ‘भारत रत्न’

म्हणून आदराने, कर्माभिमानाने सारा देश हळहळला।

शिक्षक

एक श्रीफळ फोडूनी

पेन्सिलचा हात हातात धरूनी

काढला होता श्रीगणेशा सुंदर

नव्या कोऱ्या काळ्या पाटीवर

मुळाक्षरांनी मुळ धरले

बाराखडीला घोकविले

तीस पर्यंत पाढे पाठ

स्कॅालरशिपची दाखवली वाट।

नवी शाळा नवा थाट

छडीने लावली गणिताची वाट

सुत्रांशी गट्टी करुनी मोडला धाक

गणित, विज्ञान भीती झाली खाक

गोडी म्हणता म्हणता

वेड लावले शिकण्याचे

तारे, लाल शेरे कौतुकाचे

स्वप्न दाखवू लागले उदयाचे

समानतेचे बीज पेरले

समाजाने जरी न मानले

नतमस्तक हे शीश राहीले

ज्या ज्ञानाने आज घडविले

गुरूवर्यं, शिक्षक पुजनिय

सरस्वती सम वंदनीय

ज्ञानाचे सारे ते वाटाडे

आदरनिय मज सदा ते ध्येयवेडे।

मैत्री

नात्यात मैत्री असू दे

अथवा मैत्रीत नात असू दे

काय फरक पडतो भेटू दे

अथवा न भेटू दे

मोकळ एक ठिकाण असू दे

शब्दा विना संवाद घडू दे

ऋणानुबंधाने एवढच सत्य जाणू दे

बंधनात फक्त मैत्री असू दे

आला श्रावण मास

हर्षाचा मास, वर्षाचा मास,

आला श्रावण मास॥धृ॥

चराचरातून तिमिरातून

प्रकाश जागर करी

श्रृंखला तोडून ,साद ऐकून,

वरूण विलास करी॥१॥

आला श्रावण….

सजला मंडप क्षितिजा वरी

सप्तरंगी धनु महिरप धरी

ऊन सावली लपंडाव सरी

चंचल वसुधा दिसे साजिरी॥२॥

आला श्रावण ….

दवबिंदूंची हिरक गळसरी

लता माळूनी नवथरी

हिरवाईचा पदर भरजरी

तिट लावा कोणी तरी॥३॥

आला श्रावण….

फुलूनी श्रावणी सुकुमारी

कर वेचि सुमन सरी

अविचल वसुधा गोजिरी

मन विलासी सुख स्वर्गी ॥४॥

आला श्रावण …..

भोग

अमोघ योगी भोग अघोरी

अराजक एक घटीका असावी

अगंतूक अमळ चाहूल लागावी

अनामिक एक हुरहूर जागावी

अशी अगळीक अचानक घडावी

अर्जित भीती अगतीक दिसावी

आतूर मनाची अधिरता शमावी

अंतरी उजळावी दिव्य अज्या

अवचित आसमंती उदय ओजस्वी

अबोध अजानता नाद अनादी

अघटित अचरज धून नसावी

आकलनिय चिरशांत गती लाभावी